जेमतेम २५ वर्षांचे आयुष्य लाभलेले धरतीआबा बिरसा मुंडा हे नाव आदिवासी नव्हे तर समस्त भारतात एक लढवय्या क्रांतिकारक म्हणून आदराने घेतले जाते. १८९०च्या दशकात जेव्हा संपूर्ण देश इंग्रज अमलाखाली होता आणि मेकालेचे शिक्षण घेऊन पांढरपेशी वर्ग गोऱ्या साहेबांची चाकरी करत होता त्या काळात बिरसा मुंडा छोटा यांनी नागपूर परिसरात 'आबुआ: दिशोम रे अबुआ: राज' अशी गर्जना करत साम्राज्यवादी राजवटी विरोधात संघर्ष पुकारला. बिरसा मुंडा यांचं नाव घेतलं की उलगुलान हा शब्द आपोआप ओठी येतो. उलगुलान म्हणजे 'सर्व क्षेत्रात एकाच वेळी केलेला उठाव, क्रांती' धरती आबा बिरसा मुंडा यांनी उलगुलानद्वारे समाजिक, वैचारिक, धार्मिक अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीला झुगारून आदिवासी जनसमूहांनी लढण्यास सज्ज राहण्याचा संदेश दिला. बिरसा मुंडा यांनी जल-जंगल-जमीन अशा सर्व नैसर्गिक संसाधनावर आदिवासींच्या पारंपरिक, सामूहिक हक्काचे संरक्षण केले. निसर्गाला ओरबाडणारी नफा केंद्रित भांडवली व्यवस्था नाकारली. धरती आबा बिरसा मुंडा 'मरण पत्करेन पण शरण जाणार नाही' या बाण्याने लढले. बिरसाने आदिवासी समाजाला आपल्या न्याय्य हक्कासाठी मारायला शिकवले त्यातूनच आदिवासी जगणं हे अधिक प्रखर केलं.
आदिवासींच्या लढ्याचा हा इतिहास तथाकथित मुख्यधारेने कायम अनुल्लेखाने मारला आहे. परंतु चळवळीने आदिवासींचा हा इतिहास लुप्त होऊ दिलेला नाही. त्यामुळेच महाश्वेतादेवी या संवेदनशील लेखिकेने बिरसा मुंडाच्या जीवनावर जेव्हा 'अरण्येर अधिकार' ही कादंबरी लिहिली तेव्हा तिचे स्वागत झाले आणि अनेक भाषांमध्ये भाषांतरीत होत ती घराघरात पोहोचली. महाश्वेतादेवी यांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून परिघाबाहेर फेकल्या गेलेल्या बिरसा ह्या क्रांतिकारक नेत्याचे चरित्र अत्यंत सहृदयतेने आपल्यासमोर मांडले आहे. 'अरण्येर अधिकार' या कादंबरीचा नायक 'बिरसा मुंडा' हा इंग्रज आणि त्यांचे सहाय्यक झालेल्या जमीनदार लोकांविरुद्ध विद्रोहाची ठिणगी पेटवितो, शोषणाच्या विरुद्ध जनमानस संघटीत करतो आणि त्यासाठी आपले मात्र पंचवीसाव्या वर्षी बलिदान देतो.
मराठीत प्रभा तुळपुळे यांनी ही कादंबरी भाषांतरीत केली. मराठी साहित्याच्या दालनात त्यांचे हे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
'अरण्येर अधिकार' ही कादंबरी आता मराठी वाचकांसाठी नव्या स्वरूपात उपलब्ध होत आहे ही अत्यंत अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे. शंभर सव्वाशे वर्षानंतरही बिरसा मुंडा यांचे विचार, कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. आज आदिवासींचे अस्तित्व संकटात आहे. आदिवासींचे जंगल संपत चालले आहे. आदिवासींची समतामूलक संस्कृती, आदिवासींच्या सामूहिक परंपरा आता लोप पावत आहेत. भांडवलशाही पर्यावरणीय संकट निर्माण करून सृष्टी नष्ट करण्याच्या दिशेने जात असताना सर्व मानव समाजाला आदिवासींच्या मूळ निसर्गकेंद्रित जीवन पध्दतीला स्वीकारावे लागेल. तर आणि तरच आपण सर्व जगू. धरती आबा बिरसा मुंडा यांचे संघर्षमय जीवन पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
- काळूराम का. धोदडे, संस्थापक : भूमिसेना, आदिवासी एकता परिषद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा